वैशाखातला वणवा जेष्ठातल्या मान्सूनने विझला की वैष्णवांचा मेळा देहू आंळदीत जमा होतो कैवल्यमुर्ती ज्ञानदेव आणि जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालख्यांच पंढरपूर कडे प्रस्थान होत आहे .लाखो वारकरी एका नादाने शेकडो मैल पायी चालत आहेत.
पालखी प्रस्थान वेळी इंद्रायणीचा काठ 'ज्ञानोबा तुकाराम' या मंत्राने भारुन जातो. एकात्मतेचा संदेश देणारा जगदविख्यात सोहळा सुरु होतो. लाखो वारकरी एका ताला सुरात 'माऊली माऊली' गजर करीत मार्गक्रमण करतात.
आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पार पडले वारीची भगवी पताका खांद्यावर घेऊन अविरत चालणारा वारकरी आज साश्रुनंयनांनी आपल्या सोबत चालणाऱ्या संताना पाहत आहे.
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला हा सोहळा देव आणि भक्त यांच्यातील संत परंपरेचा लोभसवाणा सोहळा आहे.भक्तीची परिसीमा आहे. अखंड हरिनामाचा जागर आहे. मराठी रयतेचा आनंद सोहळा आहे.
![]() |
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान देवाची आळंदी |
महाराष्ट्राला संत परंपंरेचा एक अमोल ठेवा मिळाला आहे. विविध जाती धर्माच्या संतानी आपल्या अभंगातून भक्तीच महत्त्व सांगीतले आहे. सामाजिक जीवन स्वच्छ नितळ व सुंदर करण्यासाठी या संत साहित्याचा मोठा वाटा आहे. सहज सुंदर वाणीतून उमटलेले हे अभंग माणसाला शेकडो वर्षांपासून माणूसपणाची शिकवण देत आहे.
आळंदी पंढरपूर ही दिंडी पालखी वारी या नावाने ओळखली जाते पण ही मानवतेची शिकवण देणारी शाळा आहे. संस्कार केंद्र आहे.
आज संताच्या या पालख्यांमध्ये लाखोंचा जनसमुह आहे संताचे विचार अभंग प्रत्येकाच्या मनामनात आहेत म्हणूनच त्यांची शिकवण मराठी माणसांच्या घराघरात आहे.
पायाने केलेला प्रवास...ह्रदयाने केलेली यात्रा आणि शरीर आणि मन हरपून केलेली पंढरीची वारी अशी अद्वितीय आहे.
विठ्ठलाच्या प्रेमाने माऊलीच्या जयघोषाने अखंड वारी चालू आहे मागची शेकडो वर्ष हरिनामाचा गजर करीत हि भक्तीची सांस्कृतिक भगवी पताका निळ्या आसमंतात फडकत आहे. आळंदी पंढरपूर हा देखणा सोहळा काल अखंड हरिनामाच्या जयघोषात सुरु झाला आणि टाळांचा कडकडाट वीणेच्या मंजुळ सुरात राम कृष्ण हरी हा जप देखील सुरु झाला. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कष्टकरी या वारीत सहभागी होतात आपल्या सोबत संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकोबाराय चालतायेत या ध्यासाने हि पाऊले पडतात. जीवनाचा सात्विक आनंद या वारीत मिळतो जगण्याच्या रोजच्या लढाईतील काही क्षण आत्मिक आनंदाचे असतात त्यातील हा आनंद आहे. सुखाचा सोहळा वारकरी अनुभवतात त्यातील आनंद जगतात लोकांना विठ्ठल विठ्ठल म्हणत प्रेमाची भाषा बोलतात. समानतेचा धागा अखंड विणतात.
लहान थोर स्त्री पुरुष जाती धर्माच्या पलीकडे वारी महाराष्ट्र संस्कृती दाखवते एकात्मकतेचे दर्शन घडवते. सर्वांना एकत्र येण्यासाठी वारकरी गोपाळकाला करतात ... सारे सारे एक होतात एकमेकांना घास भरवतात.
भागवत धर्माची समानतेची हि वारी अखंड तेवत असणारी समई आहे. माणसाला माणूसपण शिकवणारी आई आहे.