Type Here to Get Search Results !

प्रतिभावंत लोकशाहीर आणाभाऊ साठे


  प्रतिभावंत लोकशाहीर आणाभाऊ साठे




जनसामान्यांचा असामन्य प्रतिभावंत लोकशाहीर आणाभाऊ साठे यांची आज जयंती. सर्वसामान्य लोकांची वेदना आपल्या साहित्यातून लोकांपर्यंत पोचवणारा आणि त्या वेदना सहन करणारा हा शाहीर खऱ्या अर्थाने लोकशाहीर होता. कृष्णा कोयनेच्या खोऱ्यात जन्माला आलेल्या आण्णाभाऊना सामाजिक आणि आर्थिक विवंचनेत जीवन जगावे लागले.
पण काही प्रमाणात समाजाची उपेक्षा आजही कायम आहे. एखादा प्रतिभावंत कोणत्या समाजात जन्माला यावा हे त्याच्या हातात नसते पण समाज मात्र त्याला त्या समाजापुरता बंधिस्त करतो. आण्णा भाऊ यांनी विपुल लेखन केले. समाजातील खरी दुखः लोकांच्या समोर मांडली. वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारा महान लेखक आण्णा भाऊ साठे आहेत.
वयाच्या ११ व्या वर्षी मुंबईच्या भायखळ्यात साठे कुटुंब गेले आणि तिथे मिळेल ती कामे करू लागले. आण्णा भाऊ घरगडी, हमाल, मुलांना सांभाळणारा, बूट पोलिश हि सारी कामे करत. त्यावेळी रस्त्यावरच्या दुकानाचे बोर्ड आणि सिनेमाचे पोस्टर पाहून त्यांची अक्षरांची ओळख झाली. आणि मग लिहिणे वाचणे सुरु झाले. काम करत पोवाडे, कवन गुण गुनायला सुरुवात झाली. फार कमी वयात आण्णा भाऊ यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी आली. मग कोहिनूर मिल मध्ये गिरणी कामगार म्हणून काम सुरु केले. पण नशिबाने पुन्हा साथ सोडली आणि गिरणी बंद पडली. आण्णांना मुंबई सोडून वाटेगावला यावे लागले त्यांना कुटुंबाची उपासमार सहन होत नव्हती. गावात आल्यानंतर हाताला काम नसल्याने त्यानी नातेवाईकाच्या तमाशात काम सुरु केले. धारदार आवाज आणि गण, गवळण, बतावणी , यात त्यांचे काम लोकांना आवडू लागले. आणि त्याच वेळी तमाशाचे वग त्यांनी लिहिले ज्यातून गरिबी आणि सामाजिक वास्तवता लोकांच्या समोर आली. लेखणीची किमया त्यांना जाणवू लागली. एका गरीब माणसात एक प्रचंड मोठी प्रतिभा आहे हे त्यांना जाणवले.
पण त्यांचे मन फार वेळ गावाकडे रमले नाही त्यांनी पुन्हा मुंबई गाठली पण नव्या रूपाने . एक वेगळी समज घेऊन आपले जीवन हे कुटुंबासाठी आहे तसेच ते समाजासाठी पण आहे हे त्यांनी जाणले आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला. गोवा मुक्तीसाग्राम त्यांनी गाजवला. याच दरम्यान शाहीर अमर शेख आणि अनेक शाहिरांची ओळख झाली साहित्याचा प्रवास सुरु झाला. अनेक पोवाडे त्यांनी लिहिले.
गिरणी कामगाराची व्यथा लिहिताना ..".माझी मैना गावाकडे राहिली.. माझ्या जीवाची होतेय काहिली" आदी कवणे त्यांनी सहज लिहिली जे कामगाराच्या कुटुंबाची ससेहोलपट दाखवीत होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा ध्यास घेतलेल्या आण्णा भाऊंनी समाजातील व्यथा आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यानी लिहिलेल्या वैजान्ता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ,वारणेचा वाघ, फकिरा अशा कादंबऱ्या तून वास्तवाचे दर्शन घडते तर तीनशे लघुकथा, अनेक कथा संग्रह ,पोवाडे, ललित कथा असे अनेक साहित्य त्यांनी अजरामर केले आहे.
त्यांच्या साहित्याचे अनेक भाषेत भाषांतरे झाली गुजराती, हिंदी, तमिळ, उडिया, मल्याळी, बंगाली, या देशी तर रशियन, इंग्लिश, पोलिश, फ्रेंच, झेक, या जागतिक भाषेत भाषांतरे झाली आहेत.
आज त्यांची जयंती साजरी होत आहे . एका प्रतिभा संपन्न माणसाला त्या निमित्ताने मानाचा मुजरा.............!

                                                                                                                                  --- बिपीन जगताप



लोकशाहीर आण्णाभाऊ साठे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.