
नागपंचमी, नारळी पोर्णिमा, रक्षाबंधन,स्वतंत्र दिन असे महत्वाचे सण घेऊन येणारा हा महिना सर्वाना आनंद देऊन जातो. अध्यात्मिक मंडळींचा देखील हा उपासनेचा महिना आहे.
ज्याला आपण शत्रू मानतो आणि दिसला तरी मारायला धावतो अशा नागाची, सापांची पूजा आपल्याला हा महिना करायला भाग पाडतो. साप विषयी आपल्या मनात भूतदया निर्माण करणारा हा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. भाव बहिणी च्या नात्याला एक परंपरा देणारा आणि मानवी जीवनातील नाती जपणारा रक्षा बंधन हा सण देखील श्रावण घेऊन येतो. मनात बहिणीच्या बद्दल प्रेम आस्था निर्माण करणारा हा सण मानवी मनाला उच्च स्तरावर घेऊन जातो. बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी देणारा हा सण नात्यांची वीण घट्ट करतो
ज्याच्या जीवावर आपण मासेमारी करतो ..आपला संसार ज्यामुळे चालतो अशा समुद्राची पूजा करण्याची एक महान परंपरा श्रावण महिन्यात येते. समुद्राला देव मानून कोळी बांधव सोन्याचा नारळ नारळी पौर्णिमेला समुद्रात टाकतात. त्या अथांग सागरापुढे नतमस्तक होतात. आणि मग तो सागर देखील उसळी मारतो. नतमस्तक झालेल्या माणसाच्या गळा भेटीला आतुर होतो.
स्वतंत्रता दिन याच महिन्यात साजरा होतो. जीवाची बाजी लावून भारतमातेला स्वतंत्र करणाऱ्या हुतात्म्यांना या दिवशी मानवंदना दिली जाते.
श्रावण महिना निसर्ग आणि माणसांची नाती घट्ट करणारा महिना आहे