हैप्पी बर्थ डे.........हरिणी....!
सोलापूर जिल्हातील बार्शी तालुक्यातील येळम्ब या गावात आज मंगल कार्याची धामधूम सुरु होती. श्री मिटू काळदाते यांच्या घरासमोर मोठा मंडप टाकलेला होता. सनई च्या सुरांनी वातावरण मंगलमय झाले होते. मंडपाच्या शेजारी पाकखाना सजला होता. सकाळ पासून आचारी मिष्टान्न करण्यात तल्लीन झाले होते. सगळे पै- पाहुणे नटून थटून येत होते...घरात एकाच धांदल उडाली होती ..कोणीतरी सहज काळदाते यांना विचारले "लग्न कोणाचे आहे..." ? काळदाते हसत म्हणाले "अहो लग्न नाही माझ्या हरिणी गाईचा २५ वा वाढदिवस आम्ही साजरा करतोय..." ऐकणाऱ्या माणसाला जोर का झटका धीरेसे लगा असा जोरदार धक्का बसला नसेल तरच नवल...!
२५ वर्षापूर्वी ती घरात आली... .मायेने तिने सगळ्यांना जिंकून घेतले....तिचे नाव आम्ही हरिणी ठेवले....प्रेमाचा पान्हा देऊन पोरा लेकरांना वाढवले....तिचे दुध विकून पोरगा एम.बी.ए झाला....मोठ्या कंपनीत नोकरीला लागला..... आज माझे आणि तिचे नाते एवढे अतूट झाले कि तिच्या प्रेमाखातर तिचा २५ व वाढदिवस साजरा करत आहे ...भावना विवश होत आपल्या लाडक्या गाई बद्दल श्री मिटू काळदाते बोलत होते.
माणूस आणि पाळीव प्राणी यांचे नाते किती अतूट असते. भारतीय परंपरेत भूतदया किती महत्वाची मानली जाते.याचा प्रत्तेय या निम्मिताने येत होता. गाईचे संगोपन करत आपला संसार सुखाचा करत असताना गाईवर माणसाचे प्रेम बसते. घरात मांजर,कुत्रा या प्राण्यांबरोबरच गाई हि महत्वाची होऊन जाते. शेती करणाऱ्या बळीराजाच्या जीवनात गाई बैलांचे महत्व अनन्य साधारण असते. त्यामुळे शेतकऱ्याला गाय, बैल हि आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतात. गाईची शेतकऱ्याच्या सुख दुखःत बरोबरीची साथ असते. तिच्या दुधावर आपण धष्ट पुष्ट होतो. तिच्या शेण खतावर आपली शेती पिकते. तिच्या अंगणातील अस्तित्वाने आपल्या घराची शोभा वाढते. तिच्या प्रेमळ डोळ्यांनी आपण दुखः विसरतो. तिच्या वासरा बरोबर आपली मुलबाळ खेळतात..मोठी होतात...अशीच भावना शेतकरी वर्गाची असते.
पण अनेक लोक या प्राण्यांचे उपकार विसरतात. आपल्या संकटाच्या काळात ज्या गाईने आपल्याला साथ दिली त्या गाई आज मोठ्या प्रमाणत कत्तल खान्याकडे जाताना आपण पाहतो. गाई हि भारतीय परंपरेतील सर्व श्रेष्ठ प्राणी म्हणून ओळखली जाते.पण आज तिची होणारी दुर्दशा आपण रोखू शकत नाही कारण गाईला आपण विसरत चाललो आहोत असे असताना श्री काळदाते यांनी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास पात्र आहे. सजीव प्राण्यांबद्दल असे प्रेम पहिले कि आजही माणुसकी आणि मानवता जिवंत आहे याची खात्री पटते.
आपल्या लाडक्या हरिणीची कथा सांगताना श्री काळदाते म्हणाले " कुटुंबाला शेती हाच आधार असताना माझ्या बरोबर माझी हरिणी गेली २५ वर्षे राबते आहे . कधीही मला संसारात हरिणीने पैसे कमी पडू दिले नाहीत. माझ्या मुलाच्या शिक्षण या हरिणीने केले आहे हे मी विसरू शकत नाही... हिचे दुध मोठ्या प्रमाणात निघत .... ते घरात ठेऊन काही विकून संसाराला हातभार लागत आहे ... आज तिचा आधार नसता तर मी माझ्या संसारात यशस्वी झालो नसतो. हरिणी हि फक्त गाई नाही तर ती माझी आई आहे.... अगदी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी....म्हणूनच तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी आज तिचा भला मोठा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या पत्रिका छापून पंचक्रोशीत वाटल्या आहेत. सगळ्या पै - पाहुण्यांना आग्रहाने बोलावले आहे. सगळ्यांना गाईचे महत्व पटावे तिच्या दुधाची किमंत समजावी एवढीच या मागची माझी माफक अपेक्षा आहे. गाईला खुप छानपणे सजवण्यात आले आहे. तिच्या शिंगाना रंग बेगड तर अंगावर मखमली झूल टाकण्यात आली आहे. नव्या दाव्याने तिला बांधण्यात आले आहे. गोड पुरण पोळी तिला भरवणार आहे. लोकांना या गाई बद्दल प्रेम निर्माण व्हावे यासाठी आज संपूर्ण तालुक्यातील लोकांना आणि जनावरांच्या डॉक्टरांना बोलवण्यात आले आहे". असे अगदी कौतुकाने श्री काळदाते सांगत होते.
सौ सुषमा काळदाते या हि नटून थटून गाई ला औक्षण करत होत्या. सौभाग्याचे लेणे कुंकू गाईच्या कपाळाला लावत होत्या. सगळे कुटुंब आनंदाने या सोहळ्यात सहभागी झाले होते. श्री काळदाते यांची मुलगी शिल्पा आणि मुलगा अमित हे देखील हरिणी बरोबर छायाचित्र काढून घेत होती. आलेली पाहुणे मंडळी जेवणार तव मारत होती. भरलेल्या पोटाने आणि मायेच्या मनाने काळदाते आणि हरिणीला वाढदिवसाच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत होते,
आज समाजातील प्रेम आणि माया हरवत असताना आपल्या लाडक्या गाईवर प्रेम करणारे कुटुंब पाहून उपस्थितांचे डोळेही पाणवत होते.....आणि अंगणातील सजवलेल्या कोपऱ्यात बांधलेली हरिणी आपले हरणासारखे डोळे मिचकावत या सगळ्या कौतुक सोहळ्याला आपल्या डोळ्यात साठवत होती.
( आपणाला हि श्री काळदाते यांना शुभेच्छा द्यावयाच्या असतील तर त्यांना मोबईल करा . श्री मिटू काळदाते - ९९२२२४०९५५)
-- बिपीन जगताप
Social Plugin