Type Here to Get Search Results !

वर्षा सहल ......एक निसर्ग संपन्न अनुभव

वर्षा सहल ......एक निसर्ग संपन्न अनुभव


श्रावणातील बरसणारा घननिळा.... हिरव्यागार झालेल्या  पर्वतरांगा.....अखंड वाहणारे शुभ्र दुधाचे धबधबे.....आणि नजरेत न मावणारे निसर्ग सौदंर्य जगण्याचा आनंद अनुभव  द्विगुणीत  करणारे आहे.
महाराष्ट्राला कणखर देशा....दगडांच्या देशा..असे म्हणताना निसर्ग सौदर्यांने ओतप्रोत भरलेल्या महाराष्ट्र देशा...असे म्हणावेच लागेल इतका महाराष्ट्र सुंदर आहे.
पण वरील वर्णन पहायाचे असेल तर सह्याद्रीच्या पर्वतरांगाना भेटण्यासाठी उघडे डोळे ठेवून सह्याद्रीच्या कुशीत जावेच.
वर्षभर हिरवाईची चादर पांघरुन  उभा असलेला सह्याद्री पावसाळ्यात अवर्णनीय दिसतो तो  निथळत असतो....चिंब चिंब होत असतो.
घोंघावणारा वारा....आणि  कोसळणारा पाऊस जिवाचा थरकाप उडवत असतो.
नुकतेच  माथेरानच्या पायथ्याशी जुम्मापट्टी या ठिकाणी काही सहकाऱ्यांसमवेत वर्षा सहलीला गेलो होतो.
सकाळी साडे आठ वाजता बच्चे कंपनीसह निघालेला हा ताफा सकाळी अकरा बारा च्या आसपास  जूम्मापट्टी या निसर्गाने ओतप्रोत भरलेल्या ठिकाणी पोहचला.
स्वागतलाच घों घों करत अखंड वाहणारा जोरदार वारा.....श्रावणातील अवचित कोसळणार्या धारा....हिरव्यागच्च  झाडाझांडामधून  निथळणारे पाणी....आणि ....शुभ्र दुधाचे धबधबे ....निसर्गाच्या विराट अचाट रुपाचे दर्शन देत होते.
आभाळातील काळे ढग वाऱ्याबरोबर पुढे सरकत जाताना अंगाला स्पर्शून जात होते.
 समोरच्या धबधब्याचे लोट अंगाखांद्यावर घेण्यासाठी सहलीला गेलेले मानवी जीव कासावीस झाले होते. थंडगार पण पांढरेशुभ्र तुषार मनाला उल्हासित करीत होते.
सतत वाहत राहील्याने निर्मळ शुद्ध कसे राहता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाहणारे हे पांढरे शुभ्र धबधबे...!
पाणी जीवन आहे याची सतत् जाणीवही करुन देत होते. .
माणसासारखा अतिशुल्लक जीव नटून थटून नसणारे सौदंर्य दाखविण्याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न करतोना त्यावेळी अशा या अप्रतिम निसर्ग सौदर्यात जायाला हवे त्याला रुप आणि सौदर्य म्हणजे काय या व्याख्येचा अर्थबोध होईल.
निसर्गाची अद्भुत आणि अगम्य रुपे न्याहळताना मन तल्लीन होऊन जाते.
पाण्याचे नाचत खळाळणे.....उन्ह पावसाचा सुरु असलेला लपंडाव....आभाळात पडलेला सप्तरंगांचा इंद्रधनूष्य....निसर्गाचा गूढ आवाज ...अथवा शुद्ध,...प्राजंल....अखंड....विराट...हे शब्द अनुभवायचे असतील तर मग एकदा घरा  बाहेर पडायलाच हवे....मनाची घुसमट....दाबलेल्या इच्छा आकांक्षा....यांना मोराचे पीस लावून अशा मनाला भुरळ घालणाऱ्या ठिकाणी एकदा जाता आले पाहिजे.
मुलांनाही मोबाईल आणि टिव्हीच्या आभासी जगातून थोडावेळ का होईना असा निसर्ग दाखविला तरच ते उद्याच्या पिढीचे खरे निसर्ग मित्र होतील.....पावसात भिजल्याने सर्दी खोकला होतो एवढेच सतत म्हणत बसण्यापेक्षा एकदा भिजून बघाच ....काही होत नाही ....एकूणच काय तर...वर्षा सहलीचा यंदा मनसोक्त आनंद घेता  आला.... ! जय हो....!

- बिपीन जगताप

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.