आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भता असलेला माणूस आजुबाजूच्या लोकांमध्ये बदल व्हायची वाट न पाहता स्वत:मधे काय काय बदल व्हायला हवेत यावर विचार आणि कृती करतो !
प्रगल्भता लाभलेला माणूस समोरच्या माणसांना त्यांच्यातील गुणदोषांसहित सहजपणे स्वीकारतो. माणूस जसा आहे तसा स्वीकारण्याची वृत्ती असणे म्हणजे प्रगल्भता असणे !
प्रत्येक व्यक्तीचे एखाद्या बाबीबद्दल असलेलेले मत खोडून काढण्यात आपली उर्जा वाया घालवण्यापेक्षा असा परिपक्व माणूस प्रथम हे कबूल करतो की एकाच गोष्टीबद्दल प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो ! त्या मतांचा आदर करून ती शांतपणे ऐकून घेणे महत्वाचे असते. आज आपला विचार दुसऱ्यावर थोपवणे हे अत्यंत घातक आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढणे आवश्यक आहे. समाज एकसंघ राहण्यासाठी अशी प्रगल्भता प्रत्येक व्यक्तीत येणे खूप महत्वाचे आहे. भूतकाळातील अनेक गोष्टींना उजाळा देण्याऐवजी “झाले गेले विसरून जावून नवी सुरवात करायला हवी!”
साधारणपणे असे मानले जाते की माणसाचे वय वाढले की त्याच्याकडे प्रगल्भता आलेली असते, पण वयाप्रमाणे जे काही शहाणपण वा ज्ञान माणसाकडे येते त्याने प्रगल्भता येईलच असे नाही! वय वाढले म्हणून किंवा एखादी उच्च पदवी घेतली म्हणून येण्याची माणसात प्रगल्भताही आली असे होत नाही.कुणी असेही म्हणतात की एकदा दोनाचे चार हात केले की सुखी संसारासाठी आवश्यक तेव्हढी अक्कल आपोआप येते,हा विचार तर शुध्द वेडेपणा आहे! वयाबरोबर समजूतदारपणा वाढू शकतो पण समजूतदार माणूस आहे म्हणून तो प्रगल्भही आहे असे मानणे धाडसाचे होईल. मुळात परिपक्वता आणि अध्यात्मिक प्रगल्भता यात प्रचंड फरक आहे.आयुष्यात आनंदी सुखी व समाधानी असण्यासाठी माणसाकडे ही अध्यात्मिक प्रगल्भता येणे आवश्यक आहे. आपण सहजपणे म्हणतों की मी आता प्रगल्भ आहे, पण व्यावहारिक परिपूर्णता आणि प्रगल्भता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते.
बिपीन जगताप