Type Here to Get Search Results !

प्रवचनकार प्राध्यापक

 

आज निवृत्तीच्या दिवशी देखील ते त्याच वेशात होते....जगातील नव्या तंत्रज्ञानाचे अनेक बदल त्यांनी सहज स्वीकारले व्हाट्सअप ते फेसबुक असा प्रवास देखील केला पण त्यांनी त्यांचा पेहराव आजही तोच ठेवला. कांबळेश्वर गावचे प्रा. राजेंद्र आगवणे सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त महाविद्यालयात सत्कार झाला.  
प्रदीर्घ सेवा म्हणजे जवळपास 35 वर्ष त्यांनी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
 मागील दोन पिढ्यामध्ये होणारे सामाजिक, आर्थिक, तांत्रिक बदल त्यांनी जवळून अनुभवले पण नवी पिढी घडवताना त्यांनी त्यांची त्तत्व, अध्यात्माची आवड आणि सामाजिक बांधिलकी आहे तशी जपली आणि  अनेकात ती रुजवली आहे.
गावातील अखंड हरिनाम सप्ताहातील पारायणात ते सहज समरसून जातात आणि मारुती मंदिरातील भजन गाताना ते तल्लीनही होतात.!!  
महाविद्यालयातील विविध कार्यक्रमात ते सहभागी असल्याचे मी अनुभवले आहे. मराठीचा प्राध्यापक ते प्रवचनकार हा त्यांचा प्रवास विलक्षण प्रभावी आहे. 
बारामतीला टि सी कॉलेजला मी अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर आगवणे सर मला मराठी शिकवायला होते आपल्या गावचे असल्याने आम्हाला भारी कौतुक होते. सरांचे लेक्चर म्हणजे मराठीचा व्यासंग होता. प्रभावी अभ्यासाचा परिपाठ होता.माझे गुरु म्हणून मला त्यांचा नेहमीच अभिमान वाटतो. 
आपल्या गावात व्यसनमुक्तीची चळवळ राबवावी नवी पिढी आरोग्यवान घडवावी यासाठी त्यांनी आम्हा सगळ्या तरुणांना नवी दिशा दिली. जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या चळवळीत आगवणे सरांनी आम्हाला सामील केले.दरवर्षी वेगवेगळ्या किल्यांवर असणाऱ्या प्रतापी युवक संस्कार सोहळ्याला आम्ही सगळे जायचो. दहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामुळे आम्हाला जगण्याचा नवा उद्देश मिळाला. 
https://drive.google.com/uc?export=view&id=1fD_19lmCdqxpG0OUO4rcCceYlSBzVlLs
सरांनी आम्हाला पहाटे सकाळी शाळेत योगासने शिकवली प्राणायाम शिकवला अनेक विषयांवर सखोल चर्चा केली. आमच्या सारख्या नव तरुणांना त्यांनी अध्यात्मिक अभ्यासाची गोडी लावली.आम्हाला माहित नसणाऱ्या अनेक अध्यात्मातील गोष्टी त्यांनी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितल्या ज्या आजही ठळकपणे आठवतात. गावातील ग्रामस्वच्छतेत देखील सर सोबत असायचे. 
आगवणे सरांनी कॉलेज जीवन जवळून अनुभवले अनेक विधार्थी आले अनेक विधार्थी गेले त्यांच्या पेहरावावरून अनेकदा त्याची मस्करी देखील झाली असेल अनेकजण काही बाही बोलले देखील असतील पण त्यांनी लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जाऊन आपल्या तत्वांना विचारांना महत्व दिले. तत्वांची वाट त्यांनी सोडली नाही.ते चालत राहिले.
अध्यात्मिक मनुष्य सर्वांग सुंदर असतो. त्याला जगण्याचा अर्थ माहित असतो तो न स्तुती' ने हुरळून जातो  ना लोकांच्या निंदेने अस्वस्थ होतो.... आयुष्यातील अनेक अनुभवांनी समृद्ध असणाऱ्या सरांना मी काय शुभेच्छा संदेश देणार पण एवढेच सांगेन आयुष्यातील मोठा कालावधी आपन जनसेवेत घालवला आहे आता आपल्या सारख्या सक्रिय माणसाच्या जीवनातील दुसरा भाग सुरु झाला आहे. राहून गेलेले छंद,जगण्याचा मनमुराद आनंद आपणास मिळो.
समाजाच्या अनेक कल्याणकारी सेवेत आपला वेळ जावो आणि नाम संकीर्तनात आपण रमून तल्लीन होवो.. .. तरुणांना दिशा मिळावी आणि आयुष्याची आपण शंभरी गाठावी याच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ..!                                                   - बिपीन जगताप
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.