भगवी पताका खांद्यावर घेऊन उनापावसाची तमा न बाळगता गेली शेकडो वर्ष महाराष्ट्र वारीत चालतो आहे. शेतकरी कष्टकरी असलेला हा समाज एका श्रद्धेने पंढरीची वारी करतो आहे. कंपाळी उभा गंध, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात विठ्ठलाचे नाम वारकरी समाजाचे द्योतक आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगत्तगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या देहू आळंदीतून पंढरपुरकडे निघतात आणि लाखो वारकरी या सोबत चालतात.संताची शिकवण हे महाराष्ट्राचे मुल्ये आहेत. या मातीत जन्मलेला राजा छत्रपती शिवराय ते शाहू महाराज यांनी संताच्या शिकवणीचे पालन केले आहे. संत वैष्णव धर्माची मांडणी करतात जो समानतेवर आधारीत आहे. संताना भेद पसंद नाही. गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, जातीची उच्च निचता हे संताना मान्य नाही.
संत तुकाराम महाराज म्हणतात " विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ" जग हे एका पावन शक्तीने भरलेले आहे इथे भेदाभेद करणे अमंगळ आहे. हेच वारीचे सुत्र आहे.
संत ज्ञानेश्वरांनीही पसायदानात भगंवताकडे खळांचे खळपण नष्ट व्हावे अशी उदात्त मागणी केली आहे.
पंढरपुरची वारी म्हणजे शिस्त आहे, लोकांनी लोकांना लावलेली. संताची शिकवण अंगी उतरावी म्हणून केलेली तपश्चर्या आहे.वारीचे तीन आठवडे माणूस चालतो असा रस्ता जो त्याला समानतेकडे, भक्तीकडे, संवेदनशीलतेकडे,आणि निसर्गाकडे घेऊन जातो.
![]() |
ह.भ.प. कैवल्यमहाराज विवेक राऊत नातेपुते |
वारीच्या रस्त्यावर तो मातीत झोपतो, तो उन्हात चालतो, तो झाडाखाली बसतो, तो पावसात भिजतो, तो निसर्गातील प्रत्येक कणाशी एकरुप होतो.
संत तुकाराम महाराज म्हणतात " अणुरेणूहुनी थोकडा, तुका आकाशाऐवढा.."हा अनुभव घेण्यासाठी संताची ही वारी पंरपरा इथल्या मातीला वारकर्याला समृद्ध करते.
काळ्या मातीची आणि अथांग आकाशाची पावसाच्या सरींची भक्तीरसाने चिंब करणारी ही वारी अवर्णनीय आहे.
महाराष्ट्राची माती ही पुरोगामी आहे इथे भेदाभेद भ्रम मानला जातो हे देशाला दिसले आहे. म्हणूनच राज्याने देशाला समता बंधुत्वता शिकवली आहे.
जगाच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे, अथवा माहीती तंत्रज्ञानाच्या युगामुळेही जगात प्रंचड बदल झाले असले तरीही वारीची पंरपरा युगानयुगे चालत राहणार आहे कारण वारीचा पाया हा संताच्या भक्कम साहीत्यावर त्यातील मुल्यांवर आधारीत आहे.
भक्ती रसाने ओथंबलेल्या या वारीचा मोह अनेकांना सुटता सुटत नाही. शरिराने साथ दिली नाही तरी मन थांबत नाही पृथ्वीच्या पाठीवर भरणारा आणि चालणारा हा सोहळा स्वर्गसुखाची अनुभुती देणारा आहे.
राम कृष्ण हरि...!
- बिपीन जगताप.