![]() |
सौजन्य - गुगल संग्रहित फोटो |
खुप वर्षापुर्वी माणसं सह जीवन जगायची. आनंदाने राहायची आयुष्याचा उत्सव करीत कष्टातही समाधान शोधायची.
साधी कष्टाळू माणसं शेतात राबायची,गाई गुरांवर अतोनात प्रेम सुद्धा करायची. चटणी भाकरीतही पुरणपोळी शोधायची. पुर्वीची सगळी माणसं असंच वागायची.
संध्याकाळी दिवस कलला की घरी यायची सातच्या आत जेवायची आणि नऊ वाजताच अंथूरणावर पडायची. कधी झोप लागायची कुणालाच नाही समजायची.
शुक्राची चांदणी दिसली की उठायची. ना गजर ना घड्याळ तरी वेळ कधीच नाही चुकवायची.
नदीच्या वाहत्या पाण्यात सुर मारुन पोहायची. पुर्वेला लाल शेंदरी रंग बघून पाण्याची ओंजळ सोडायची. पुर्वीची सगळी माणसं असंच वागायची.
आध्यात्माच्या फंदात न पडता देवावर श्रद्धा ठेवायची वर्षाला हरिनाम सप्ताह न चुकता करायची. घराघरात भजन हरिपाठ म्हणायची.
पाहुणे राऊळे सगळ्यांना जपायची.माणूसकीने सगाळे व्यवहार करायची. यात्रा जत्रांना न बोलवताही वेळेत पोहचायची.पुर्वीची सगळी माणसं असंच वागयची.
दारावर आलेल्या अतिथीचे मनापासून स्वागत करायची.
गुळ शेंगदाने हातावर ठेवायची.
आपुलकीने प्रेमाचे चार शब्द बोलायची.पुर्वीची सगळी माणंस असेच वागयची.
आई वडिलांच्या समोर उलट नाही बोलायची. जेष्ठांच्या समोर नम्रपणे वागायची. गुरुजींचा मान आयुष्यभर ठेवायची. पुर्वीची सगळी माणंस असंच वागायची.
'व्यक्तीमत्व' म्हणजे आजही त्यांना काही समजत नाही.
स्वभावातील गुण दोष ते कधीच शोधत बसत नाहीत.
तरीही त्यांच जीवन सुख संपन्न समृद्धीने परिपुर्ण होत.
'जन्माला आलेला मरणारच' या भावनेतून रोजचा दिवस नवा असायचा आणि मग मरणाचा दिवस ही त्यांचे सोने करुन जायचा.
- बिपीन जगताप