मान्सूनचं वार वाहू लागल की समुद्रालाही उधान येत.... लाटांवर लाटा किनाऱ्यावर धडकतात...मोठ्या मोठ्या लाटांचा हा तांडव पाहण्यासाठी धाडसही मोठच असाव लागतं....समुद्राच्या पोटातून उठलेला हा तरंग किनाऱ्यापर्यंत येतो.... लाट फक्त लाट नसते समुद्राच्या पोटातील ती हाक असते...! माणसाच्या मनातही असेच खुप तंरग उठतात...व्यक्त होण्याच्या जागा शोधतात.....भावनामय तरंग कधी शांत लाटेप्रमाणे सहज किनाऱ्याला बिलगतात...तर कधी किनाऱ्यावर येऊन धडकतात....!
वैषाख वणवा लागला कि सुर्याच्या साक्षीने आभाळातील ढग सागराचे पाणी ओढून घेत गर्भधारणा करतात.
मान्सूनचे थंड वारे वाहू लागले की आभाळालाही प्रसव वेदना सुरु होते...खारट पाण्याचं गोड पाण्यात रुपांतरण होत..टप टप पाणी खाली येऊ लागत तापलेली धरणी माता शांत होते...प्रसवाचा असा चमत्कार होतो....नदी नाले ओढे वाहू लागतात....! सृष्टी आनंदाने चिंब होते... समुद्रालाही आनंदाची भरती येते.... मग उधानलेला सागर लाटांच्या माध्यमातून तो आनंद व्यक्त करतो.
लाटांवर लाटा उठतात....काठावर आदळत राहतात.
समुद्राच्या काठावर बसलो की खुप आनंद होतो. समुद्राकडे शांतपणा पाहत असतो... सहज उठलेला तरंग पुढे जाऊन लाट बनते म्हणूनच माणसांच्या अतंरंगाच आणि समुद्राच मला नेहमीच साम्य वाटतं...फक्त माणसापेक्षा सागर नेहमीच शांत असतो....अतंरंगातील तरंग कितीही खवळला तरी तो मर्यादेत राहून व्यक्त होत असतो.
समुद्राच्या लाटांचा आवाज तो गाज माणसाला एकरुप करतो. आतल्या ईश्वराचा शोध घ्यायला भाग पाडतो.
जीवनात आलेल्या तुफानाला माणसाने शांत चित्ताने सामोरे जाण्यासाठी समुद्र प्रेरणा देत राहतो.
लाटांचा जन्म एकामागून एक होत असतो...एक लाट दुसऱ्या लाटेला पुढे नेते...संसारातही असेच ऐकमेकांच्या सह्याने पुढे जाण्याची अनमोल शिकवण लाट देत राहते.
- बिपीन जगताप