Type Here to Get Search Results !

'मधाचे गाव' दिल्लीतील प्रजासत्ताक दिनात..!!

 'मधाचे गाव' 

         दिल्लीतील प्रजासत्ताक दिनात..!! 


मधमाशी वाचावी म्हणून केलेला प्रयोग आज दिल्ली पर्यंत पोहचला. मधमाशी हा सामाजिक कीटक आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाचा आहे कारण आपल्या जेवणाच्या ताटातील 70 टक्के अन्न या मधमाशामुळेच येते. 

मागील किमान बारा वर्षांपासून मधमाशीचा प्रचार प्रसार करीत आहे. छोटे मोठे लेख, या क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती, प्रत्येक्ष मधमाशीचे पोळे असे अनेक  व्हिडीओस बनवून 'Bee world' नावाने youtube चॅनेल सुरु करून मधमाशी माहिती प्रसारित करीत  आहे . 

हा विषय एवढा मोठा आहे कितीही लिहिले तरी कमीच ..पण आपल्या सगळ्यांच्या सहाय्याने आज मधमाशी अनेक लोकापर्यंत पोहचली.

मधमाशी'चे पोळ्यातील आणि पोळ्याच्या बाहेरचे कार्य अदभूत आहे. हा सामाजिक कीटक आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो. घर कसे बांधावे, बचत कशी करावी, संघटित कसे रहावे, सतत कामात व्यस्त राहत बचत कशी करावी अशा एक ना अनेक गोष्टी मधमाशी अविरत करीत असते. मधमाशी मुळे निसर्गाची अन्नसाखळी अबाधित आहे. निसगाचे संतुलन कायम राहते. आपल्या शेतीपिक उत्पादनात मधमाशामुळे 35 ते 40 टक्के एवढी वाढ होते विशेष म्हणजे पिकांचे फक्त उत्पादन वाढत नाही तर फळांची गुणवता आणि दर्जा देखील वाढतो.

मधमाशी वाचली तरच पर्यावरण वाचणार आहे पर्यायाने निसर्गाचा समतोल राखला जाणार आहे यासाठी मधमाशी वाचली पाहिजे या ध्यासाने हे काम सुरु केले आणि असेच सुरु राहील.

16 मे 2022 ला महाबळेश्वर येथील मांघर या गावाची मधाचे गाव म्हणून शुभारंभ केला.यासाठी गावातील लोकांना प्रशिक्षण दिले, मधपेट्या देण्यात आल्या वनविभागाच्या साहाय्याने मधमाशी पूरक वनस्पतींची लागवड करण्यात आली. लोकांची मानसिकता बदलली आणि गावात मधमाशीचे मधुबन, माहिती दालन, प्रचार प्रसिद्धी विक्री केंद्र उभे राहिले. गावातील उपयोगी नसलेल्या शाळेच्या इमारतीत प्रशिक्षण केंद्र आणि माहिती दालन आहे. 

 राज्यातील या पहिल्याच मधाच्या गावाला मोठा प्रतिसाद मिळाला. वर्षभरात लाखो लोकांनी या गावाला भेट दिली.  सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी देखील भरघोस निधी या गावाला उपलब्ध करून दिला. मधाच्या गावात गावात लोकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. मधाची विक्री करून लोकांना जास्तीचे पैसे मिळत आहे. गावात सेंद्रिय शेती सुरु झाली आहे. आज गावाची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलली आहे गावाला मध पर्यटन दर्जा प्राप्त झाला आहे. 

मांघर पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव देखील जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पणे पुढे आले या गावात मधमाशी सोबतच निसर्ग पाहायला हजारो लोक येत आहेत. केंद्र शासनाचा या गावाला देशपातळीवरील पर्यटनातील दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. 

या गावांचे यश पाहून फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य शासनाने 'मधाचे गाव' हा शासन निर्णय निर्गमित केला ज्यामध्ये गावाने मधमाशी पालनाला प्राधान्य देत मधाची योजना यशस्वीपणे राबवणे आवश्यक आहे. 

मधाच्या गावात मधमाशी पालन,मध संकलन ते मध विक्री पर्यंतचा प्रवास लोकांना पाहता येतो आणि आपल्या समोरच मधमाशीचा शुद्ध मध देखील खरेदी करता येतो.

आता आम्ही महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हयात जिथे मधमाशीला पूरक फुलोरा आहे अशा गावांची निवड 'मधाचे गाव' म्हणून करीत आहोत.

चिकू'साठी प्रसिद्ध असणारे पालघर जिल्ह्यातील घोलवड, नांदेड च्या किनवटच्या जंगलातील भंडारवाडी, यवतमाळ मधील अंधारवाडी, नंदुरबार मधील बोरझर, चंद्रपूर मधील मामला, अमरावती चिखलदरा येथील आमझरी अशी अनेक गावे आता मधाची गावे म्हणून पुढे येऊ लागली आहेत. 

'मधाचे गाव' हि छोटी संकल्पना आता देशाच्या राजधानीत मोठ्या दिमाखात दिसणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी 'मधाचे गाव'आपल्या राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. आपल्या सगळ्यांसाठी हि कौतुकास्पद बाब आहे.

निसर्गातील हा अनमोल कीटक वाचावा या साठी सुरु केलेला हा छोटासा प्रयत्न देशपातळीवर जातो हे निश्चितच समाधान देणारे आहे.सोबतच्या सगळ्या सहकार्यांमुळे आणि वेळोवेळी वरिष्ठानी केलेल्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले आहे. 

मधमाशी वाचवा निसर्ग वाचवा.

#मधाचेगाव

- bipin jagtap 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.