माणसांच्या जगात राहत असताना माणसांपासून दूर राहणारी माणस एकांतात जाऊन काय शोधतात त्यांनाच माहित...! याला मोठ्या भाषेत एकांतवास संबोधतात...माणसांच्या गर्दीत त्यांना ईश्वर दिसत नसेल म्हणून हा सारा खटाटोप असेल.
पण खर सांगतो म्हणजे नेहमी खरंच सांगत असतो... काही माणसांची सवय लागल्याने असं माझ्याकडून नेहमी बोलले जाते.. बघा माणसात राहिले कि अशा सवई लागतात. जाऊ द्या ते ... आपला मुख्य विषय आहे माणूस माणसा शिवाय जगू शकत नाही. आपल्याला अनेक लोक दररोज भेटतात. कधी कामानिमित्ताने तर कधी अनपेक्षितपणे ...दररोजच्या लोकांचा कंटाळा येतो. त्याच लोकांना 'काय नवीन.. 'काय विशेष'.... असे म्हणत आपण दिवस कंठत असतो. पण अचानक गावाकडला एखादा बालपणीचा सवंगडी भेटला किवा कॉलेज जीवनातील एखादा दोस्त दिसला तर मन आनंदाने उड्या मारत एक गरका घेत. त्यातच कॉलेज जीवनात जिच्यावर एकतर्फी प्रेम केल ती जर दिसली तर मनावर मोरपीस फिरवल्याचा आनंद होतो. म्हणजेच आपल्याला माणस सहज भेटावीत अस वाटत. जी आपल्या मनाला आनंद देतात
असं आणि वाटण गैर नाही. पण रोज भेटणाऱ्या माणसांवर आदळ आपट करणं मात्र गैर आहे. सरकारी कार्यालयातून याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. माणसाना तिथे येण्यास मज्जाव असल्यागत अंगावर येऊन खेकसले जाते. बिचारे आशेने लांबून येणारी लोक भितात आणि मग दबकत बोलतात. येणाऱ्या माणसाना फक्त अपेक्षा एवढीच असते आमच काम नाही झाल तरी हरकत नाही पण आम्हाला समजवून सांगा. किमान दोन शब्द प्रेमाने बोला..पण दुर्दैवाने हे होत नाही. हे फक्त सरकारी कार्यालयातच होत असं नाही तर आपल्या घरातही होत. काही पतीदेव तर पत्नीला खडसावून बोलल्याशिवाय त्यांना बोललोय यावर विश्वासच बसत नाही. आपण मायेने आस्थेने कधी कोणाला बोलताच नाही. आणि मग असे बोलू नका थोडे सबुरीने घ्या असे म्हटले कि "अहो एक देखील मनासारखा वागत नाही" असे सहज बोलले जाते.
हे जग खूप मोठे आहे आणि या जगात अनेक स्वभावाची लोक राहतात ..वागतात पण माझ्या मनासारखं दुसऱ्याने वागावे हा जो आपला हट्ट असतो तोच मोठा घातक आहे. आपल्या बद्दल ही कोणीतरी असं बोलत असेल ना .. ...!
म्हणून प्रेम दिल्याने प्रेम वाढते...आदर दिल्याने आदर ..हा निसर्गाचा नियम आहे. आणि तो आपण पाळलाच पाहिंजे. अनेक लोक आपल्या मनाला पटतील असे नाही पण मग आपण थोडे बदलावे आपल्या बदल्याने अनेक बदल दिसतील.. काही लोक ही बदलतील ...आणि मग आपल्या जीवनात लोकांचं येणे आपल्या आनंदाचे होईल आपल्या मनात त्यांचा बद्दल प्रेम निर्माण झाले पाहिजे. संकुचित वृत्तीत बदल करून. काय कसे आहात...छान दिसतंय आज अस सहज म्हणले तरी माणसाना बदल जाणवेल. लोक प्रेमाने जवळ येतील तुमच्या आनंदात आणि दुखः तही मग सहज सहभागी होतील. तुमचा एकांतवास संपेल आणि माणसांच्या गर्दीत मग तुम्हाला ईश्वर दिसेल...!
-- बिपीन जगताप