Type Here to Get Search Results !

स्त्री शक्ती ……



स्त्री एक शक्ती आहे. नव्हे शक्ती हाच शब्द स्रीवाचक आहे. म्हणूनच स्त्री आणि शक्ती वेगळ्या असू शकत नाहीत. स्त्री, बाई, महिला, मुलगी अशा नावांनी तिला ओळखले जाते.  अनेक विचारवंतानी स्त्री अबला नसून सबला आहे. असे मत मांडले आहे. महिलांना सबला करण्याचे काम अनेक वर्ष सुरु आहे.  म्हणूनच महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे म्हणले तरी आज हुंड्यासाठी होणारे छळ, स्त्री भ्रुण हत्या, महिलांना होणारी मारहाण,अन्याय, बलात्कार थांबलेले दिसत नाहीत. 
या देशात मातीला काळी आई आणि देशाला  माता, गाईला गो-माता  संबोधले जाते. त्या भूमीत महिलानांवर होणारे अन्याय दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत.वट पौर्णिमेला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना मला महिला दिसल्या.  या महिला आपल्याला सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी या झाडाची पूजा करतात. असे सांगितले जाते. झाडाला पाणी घालावे झाडाची वाढ होऊन निसर्ग खुलावा आणि वृक्षाबद्दल प्रेम निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचा एक संस्कार निर्माण केला गेला असावा.पण  'स्त्री' ला या संस्कारशी जोडले गेले आहे. माझ्या घराशेजारील एका गरीब घरातील बाईचा नवरा खूप दारू प्यायचा आणि तिला दररोज मारहाण करायचा. मला नेहमी या बाईच्या संयमाचे,तिच्या त्या सहनशीलतेचे कौतुक वाटायचे. आणि तरीहि बाई वट पौर्णिमेला वड पुजायाची  देवाच्या पुढे पुन्हा हात  जोडून तोच नवरा पुढच्या जन्मी  मागायची. आणि मला वाटायचे खरेच या बाईला मनापासून तिचा नवरा आवडत असेल का फक्त सगळ्या जनी करतात म्हणून यापण हे व्रत करतात. मी न राहवून या बाबत त्यांना विचारले त्यावेळी त्यांनी सांगितले "नवरा देव असतो आणि त्याच्यामुळे माझे कुटुंब आहे. तो कसाही असला तरी तो मला आवडतो. तो मला मारतो पण कधीतरी प्रेम पण करतो. आम्ही बाया नवऱ्याचा मार विसरतो पण प्रेम कायम लक्षात ठेवतो.त्यामुळे नवऱ्याच्या अगोदर मरण यावे हीच सगळ्या बायांची अपेक्षा असते". 
हा जो भारतीय स्त्री मध्ये असलेला गुण आपल्याला दुसरा कुठे दिसणार नाही . शोषित, सहनशील, आणि तेवढीच खंबीर असणारी महिला खऱ्या अर्थाने शक्ती आहे. पण आपण या शक्तीला पुरुषप्रधान संस्कृतीखाली घुसमट करत आहोत. तिचे क्षेत्र तिच्या मर्यादा यांना वेसन घालत आहोत. शिकलेली स्त्री म्हणजे 'फुकटचे शहाणपण' असे म्हणत तिची अवहेलना करत आहोत. महिलांना मुक्त संचार,मुक्त विचार या वर अलिखित निर्बंध घालत आहोत. स्त्रिया वरील अन्याय असाच चालू राहिला आणि शक्ती ला सतत बंद करून ठेवले तर तिचा विस्फोट होईल. आणि मग ती बाहेर येईल पण त्यावेळी होणारी हानी मोठी असेल.  या हाणीत होणारे नुकसान कशानेही भरुन येणार नाही. यात कुटुंब समाज होरपळून निघेल.
महिलांचा सन्मान करणे त्यांना स्वतंत्रता  देणे आणि या शक्तीला विधायक सकारात्मक कामात पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या खांध्यावर आहे. यात आपण पुढाकार घेऊ. आजी.आई बहिण,पत्नी,मुलगी हि नाती टिकवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू ...!

-- बिपीन जगताप 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.