तरुणांचा वेगळा आदर्श.....!
श्रम लागले सार्थकी
बोरामणी हे गाव सोलापूर हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील १६ हजार लोकसंख्येचे गाव म्हणून ओळखले जाते. गावात द्राक्ष बागायतदारांची संख्या जास्त..शिवाय गावात पैहीलावानांची संख्या हि जास्त... जुने वाडे गावातील पूर्वीची आणि आताची सुबत्ता दर्शिवतात. गावात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या गुण्या गोविंदाने राहतात. अनेक प्रयत्न करूनही गावात शौचालये बांधण्यात लोकांची मानसिकता तयार होत नव्हती. या गावातील नुकतेच आय.आर. एस झालेले मल्लिनाथ जेऊरे यांनी गावातील लोकांची विचार आणि मानसिकता बदलण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून शिवम प्रतिष्ठानच्या माध्यमातून परिवर्तन व्याख्यानमालेचे आयोजन सुरु केले. गावाला परिवर्तन करणारी अशी व्याख्यानमाला गावासाठी तशी नवीन होती कारण येणारे व्याख्याते ह्रदयाला हात घालणारे आणि डोक्यातील विचार बदलायला लावणारे उदबोधन करत होते. त्यातही शासकीय अधिकारी असणारे आणि सामाजिक कार्यातून महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देत ...तरुणाई व्यसनाच्या विळख्यातून वाचवणारे इंद्रजीत देशमुख यांचे मार्गदर्शन तरुणांना मिळाले. गावातील उघड्यावरील हागणदारी पाहून आणि महिलांची होणारी कुचंबना पाहून देशमुख साहेबांनी तरुणांना गावात शौचालये बांधावीत असा सल्ला दिला. गावातील सर्व तरुण झपाट्याने कामाला लागली. गावात शौचालय बांधून अथवा दुरुस्त करून प्रत्येक महिलांचा सन्मान होणारी खरी भेट दोन महिन्यात द्यायची असा निश्चय तरुणांनी केला आणि काम सुरु झाले. गावात खूप वर्षापासून काही शौचालये बांधण्यात आली होती पण पाण्याअभावी आणि घाणीमुळे ती सगळी निकामी झाली होती. दुर्गंधी युक्त शौचालयांची दुरुस्तीची कामे सुरवातीला सुरु केली. सगळी घाण श्रम दानातून बाहेर काढण्यात आली. एक ..एक म्हणत गावातील शेकडो तरुण यात सहभागी झाले. सुरवातीला घाणीत काम करायला नको म्हणणारे तरुण देखील नंतर यात सहभागी झाले. शौचालयांना लागणारे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. पाण्याची नवीन टाकी.. रंग आणि पाण्याचे नळ शिवाय सार्वजनिक शौचालय असले तरी आजूबाजूला स्वच्छता या तरुणांनी केली. पाणी साठणार नाही आणि घाण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. डिसेम्बर मध्ये व्याख्यानमालेत ठरवलेले स्वप्न साकार झाले. कष्टाला प्रतिष्ट प्राप्त झाली. गावातील सरपंच, उपसरपंच, नेते यांनी या तरुणांच्या कामाची वाहवा केली.
काल दिनांक १ फेब्रुवारी संध्याकाळी या शौचालयांचे महिलांनीच फीत कापून उद्घाटन केले. या वेळी महिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद विलक्षण होता. नैसर्गिक विधीला संध्याकाळ होण्यापर्यंत वाट पहावी लागत असे. यामुळे महिलांना होणारा त्रास शब्दात मांडता न येणारा आहे. आपल्याच आई बहिणीला, पत्नीला, मुलीला होणारा हा त्रास या गावातील तरुणांच्या जिव्हारी लागला होता. संवेदनशील तरुणांनी डोळ्यातून अश्रू न येऊ देता श्रम केले. शौचालये दुरुस्त केली. लोकवर्गणीतून हा उपक्रम राबिवला आणि श्रम करत तो पूर्ण केला. गावातील महिलांना सन्मानाची हे भेट देताना तरुणांच्या श्रमाचे सार्थक झाल्याची अनुभूती पाहवयास मिळत होती.
स्वच्छतेचा जागर घराघरात गावागावात घेऊन जाणाऱ्या या शिवम प्रतिष्ठानच्या शिलेदारांना माझा मानाचा सलाम........!
-- बिपीन जगताप
Email. bapujagtap@gmail.com
Social Plugin