छत्रपती शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल आपण मोठ्या उत्साहाने साजरी केली. शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास विलक्षण आहे. जीवनातील संघर्ष फार मोठा आहे. मावळ प्रांतातील अनेक दर्या खोऱ्यातील पोरांची मोट बांधून त्यांच्यात स्वराज्याचे स्फुल्लिंग पेटवून महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. रोहिडेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली. बरोबरीच्या सख्या सोबत्यांचा आत्मविश्वास वाढवला. रयतेला स्वराज्य स्वतंत्रता आणि गुलामी यातील अंतर फरक समजावून सांगितला. हर हर महादेव या घोषणेने त्यांच्यात उत्साह निर्माण केला. मावळ खोऱ्यातील या रान गड्यान बरोबर महाराज हातावर चटणी भाकरी घेऊन खात होते. आपले मोठेपण विसरून सहकार्यांच्या सुख दुख्हात सहभागी होत होते. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न ते या डोंगरातील पोरांच्यातून साकार करण्याचे नियोजन करत होते. संघटन करत असताना फक्त सोबती जोडत नव्हते तर विश्वास आणि प्रेम देत होते . मायेने प्रेमाने झोपडीत राहत होते. 'शिवबा' या नावातली शक्ती मावळ्यांना जाणवत होती. अंधश्रद्धेला मूठमाती देत आणि दैववादापेक्षा प्रयत्न वादाला महत्व देत असल्याने महाराज यशस्वी होत होते.
स्व्राजाचे तोरण तोरणा गडाला बांधत असताना महाराजांचा आत्मविश्वास वाढला. आणि आपण गड काबीज करू शकतो. शत्रूशी दोन हात करत लढाई जिंकू शकतो असा विश्वास मावळ्यांच्या मनात निर्माण झाला. शेतकरी कष्टकरी हि महाराजांची रयत होती. शिवाजी महाराज आणि येथली रयत हि एका प्रेमाच्या धाग्यात बांधली होती. रयतेला आपला राजा असावा असे मनोमन वाटत होते. आणि 'जाणता राजा' म्हणून सारी रयत महाराजांच्याकडे आशेने पाहत होती. महाराज प्रत्येकाला आपल्या घरातील वाटत. हक्काने जाऊन भांडणे सोडवावीत, हक्काने जाऊन मंगल कार्याला बोलवावे आणि 'राजा तुझ्यासाठी जीव ओवाळून टाकावासा वाटतू बघ' असे मायेने आया बाया..बापे माणस बोलत. शिवाजी महाराज जाणते राजे होते. रयतेच्या प्रत्येक कार्यात ते सहभागी होत. अन्याय संपवून न्यायाची शिकवण देणाऱ्या या राजाला माझा मानाचा मुजरा ....!
-- बिपीन जगताप
Social Plugin