स्त्री शक्तीचा सोहळा ...!
महिलांच्याबद्दल असणारी नकारत्मकता संपवण्याची आज महिला जागतिक दिनाच्या निम्मिताने निश्चय करण्याची वेळ आली आहे. गर्भात मुली मारण्याचे प्रमाण माणसाला विनाशाकडे घेऊन जात आहे. सगळ्यांना आई, बहिण, पत्नी पाहिजे पण मुलगी नको अशा अट्टहास आपण करतो आहोत हि फार शरमेची बाब आहे. समाजातील स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण समान असणे हि निसर्गाला समतोल ठेवण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. आज निसर्गाला आव्हान देत आपण पोटातील मुलीचा गर्भपात करणे धोकादायक आहे. आईच्या प्रेमावर ह्र्दय द्रावक कविते लिहणारे अनेक पुरुष या कडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहोत.
आज महिला दिन साजरा करताना समस्त महिलांना शुभेच्छा देत असताना आपण समानतेची भूमिका घेन्यास सज्ज असल्याचा विश्वास देता आला पाहिजे. समाज हा स्त्री आणि पुरुष अशा दोन चाकावर चालतो एक बाजू कायम कमजोर करून आपण सशक्त समाज निर्माण करू शकणार नाही. आद्य गुरु सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांनी समाजाच्या हितासाठी महात्मा ज्योतीबाना साथ देत स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली. 'एक बाई शिकली तर सारे कुटुंब शिकते' असा मूलमंत्र देत महिलांना शिक्षण दिले. आज 'मुलगी शिकली प्रगती झाली' असे बोलत असताना त्या थोर माउलीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आपले संपूर्ण जीवन महिलांच्या कल्याणासाठी खर्च करणाऱ्या या महिलेने क्रांती केली. आणि आज त्याची फळे आपणाला दिसत आहेत.
महिला प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. कामातील अचूकपणा त्यांना पुढे नेण्यास मदत करत आहे. मेणाहून मवाळ आणि पोलादाहून कणखर असणारी महिला आपल्याला प्रत्येक रुपात दिसते. आई आणि पत्नी माणसाच्या जीवनाला रूप आणते. आईची माया शांती आणि समाधान देते. तर पत्नीचे प्रेम संकटात आधार देण्याचे काम करते. बहिणीची माया भावासाठी उर्जा ठरते तर मुलीची काळजी जीवाला हुरहूर लावते.
मुलगी घरातून लग्न करून जाते. वयाच्या ठराविक वेळे पर्यंत मुलगी घरी असते आणि नवीन घरी पुन्हा पणती लावण्यास तयार होते. आपले आई वडील बहिण भाऊ सोडून नव्या घरी जाताना मुलगी आपल्या जन्म स्थळाचा आपल्या नात्यांचा त्याग करते. स्त्रीच्या जीवनातील हा क्षण दोन उंबरे, दोन घरे जोडण्याचे काम करतो.
महिलांनी आज धाडसी आणि साहसी बनून राहिले पाहिजे. आज स्त्री होणारे अत्याचार फार मोठ्या प्रमाणत आहेत. मानसिक शाररीक कुचंबना जास्त आहे. महिलांना पुरुष गृहीत धरतात. देशाला स्वतंत्रता मिळाल्या नंतर ६० - ६५ वर्षांनी राजकीय आरक्षण दिले गेले आहे. पण तरीही यातील कित्येक महिलांना स्वतंत्रता पूर्वक कारभार चालवण्यास दिला जातो हे पाहणे संशोधनाचा विषय ठरेल. महिलांची शक्ती स्थळे ओळखून त्यांना समाजातील प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करू दिला पाहिजे. त्यांच्यातील कौशल्ये, विकसित करून संपूर्ण मानवजातीचा विकास केला पाहिजे. यासाठी या महिला दिनासारखा दुसरा चांगला मुहूर्त असणार नाही.
मुलीच्या जन्माचा सोहळा साजरा करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलेल असा मला विश्वास वाटतो. समस्त स्त्री -- शक्ती प्रधान आहे. तिच्या शक्तीला माझा सलाम....अनेक आया बहिणींना नमस्कार....
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!
-- बिपीन जगताप
Social Plugin