Type Here to Get Search Results !

लोककलांवत आणि बदलता संवाद


लोककलावंत

आज मनोरंजनाची साधन बदललेली आहेत.प्रत्येकाला मनोरंजनाचंही 'स्वांतत्र' मिळाले आहे.एका बोटावर सारं जग जवळ आलं आहे. मोबाईल आला आणि सर्वच क्षेत्रात क्रांती झाली. सध्याचं युग हे माहीती तंत्रज्ञाना बरोबरच जगाला नव्या दिशेला नव्या वाटेवर घेऊन जात आहे.
आभासी जगात माणंस माणसापासुन दूर असली तरी रोज 'काँन्टक्ट' मध्ये आहेत.गावापासून लांब असली तरी गावाच्या,घराच्या संपर्कात आहेत.
पुर्वी म्हणजे वीस वर्षापुर्वी  घरात पोस्टमन यायचा, मनिआर्डर यायची...कधी कधी तार देखील यायची...पत्रातील मजकूर  मोठ्यांना  नमस्कार, यापासून सूरु होत लहानांना आशिर्वाद आणि गोड गोड पापा इथपर्यंत येऊन संपायचा......आजच्या पेक्षा कालचा माणसामाणसातला संवाद कदाचीत कमी असेल पण नेमका होता. त्या संवादात आपुलकीचा, सहृदतेचा,जिव्हाळ्याचा स्पर्श होता. माणसाच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा मार्ग होता.
गावाकडच्या म्हाताऱ्या डोळ्यांना डबडबायला लावणारी लेकराची माया चार आण्याच्या पत्रात असायची.
आज संवाद बदलतोय...दररोज नवी माध्यम उदयास येताना संवाद देखील कृत्रीम बनत चालला आहे.तुसडेपणाची भावना वाढीस लागली आहे.
पहिल्या पावासाची आस जशी मातीला आणि चकोर पक्षाला असते अगदी तशीच आस माणसाला लांबच्या पण आपल्या माणसांची देखील लागायची.
दिवस कोणतेही आले तरी आईची माया कधीही आटणार नाही पण तीची व आपली माया व्यक्त करण्याची पद्धत मात्र आज बदलतेय...  लोक बोलतात, हसतात पण त्यात निथळ पणा नसतो असतो तो कोरडेपणा,ढोंगीपणा...!  सिंमेटच्या शहरात नसेल पण गावाकडच्या मातीत अजूनही ओलवा आहे. तो ओलावा संवादात आला तर ..माणूसकीच्या आणि नात्याच्या सुखलेल्या झाडाला प्रेमाची हिरवीगार टवटवीत पालवी फुटेल.
'मनोरंजन' माणसाला नेहमीच उल्हासित करत आले आहे. थकलेल्या मनाला आणि जिवाला मनोरंजनाची आस लागते. त्याच्या मनाची ही भुकच असते. अनेक वर्ष बहूरुपी होत सोंग घेत माणसाने माणसाला हसवले त्याचे मनोरंजन केले. यातून मग पुढे जात चित्रपट झाले तर कधी नाटके...! आज हे क्षेत्र देखील प्रंचड मोठे होत विकसीत झाले.
लहाणपणी गावात रामलिला यायची..पुरुष माणसंच तोंडाला रंग लावत सिता होत असतं तर दहा तोंड लावत रावणही होत असंत चार घरी जावून पैसे मागत..पैसे नसतील तर भाकरी आणि धान्यही चालत ...आणि म्हणूनच पोटासाठी नाचणारा हनुमान विलोभनीय होता. हार्मोनियमवरती सुरु होणारी ती गाणी मनाला प्रफुल्लीत करत होती...रामलिला संपल्यानंतर हे कलाकार त्याच पोशाखात त्याच मेकअपमध्ये रस्त्याच्या बाजूला झाडाखाली दहा तोंडाचा रावन, राम आणि हनुमान, सिता एकाच ताटात जेवत त्यावेळी ही जगावेगळी रामलिला युती पोटभरुन हसायला लावायची.
 गावात त्या वेळी दोन काळ्या सावळ्या महीला यायच्या डोक्यावर कंगवा फणी, सुया, दाबण यांची टोपली आणि हातात छोटी घुंगर घेत लहान डफावर केशवा, 'माधवा तुझ्या नामात रे गोडवा....तुझ्या सारखा तुच देवा...तुला कशाचा नाही हेवा.' म्हणताना त्या एवढ्या तल्ल्लीन होत असत की आजच्या टि.व्ही.वरील कित्येक  रिअँलिटी कार्यक्रम त्या पूढे फिके पडतील.
गावात येणारा डोंबारी, डोक्यावर देवी घेऊन फिरणारी मरीआईवाले...पोतराज,.....भलामोठा बैल घेत गावोगावी फिरणारे नंदीबैलवाले...सगळेच गावाला समृद्ध करणारे कलाकार होते. स्वस्त मनोरंजन मनाची भुक भागवणार होत.
गावाच्या मध्यवर्ती भरणारे हे मनोरंजनाचे खेळ जसा काळ बदलेल तसे बदलत गेले.
गावातील हरिनाम सप्ताह हा अखंड होता....त्या सप्ताहातील वातावरण लोकांना भक्तीमय करीत होते.. हरिनामाचा गजर असाच अखंड राहो असेच वाटायचे...तो बंद झाला तर करमत नसे... माणसांच्यातील चांगूलपणा आणि एकत्रीतपणा हाच या मागचा मुख्य आधार होता.
मनोरंजनातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे 'तमाशा' प्रत्येक माणसाला तो बाहेरुन नव्हे पण आतुन मात्र  आपला वाटत होता..!
प्रचंड हसायला लावणारे द्विअर्थी संवाद...अंत्यंत विनोदी नकलाकार..गावाला वेड लावत..घुंगराचा आवाज आणि नर्तीकांचा पदन्यास ..अवर्णनीयच...आदल्या दिवशी येणारे हे लोक दुसऱ्या दिवशी जाताना मनाला हूरहुर लावून जात.
माणसाला एकटे जगता येत त्याला इतरांची, समाजाची गरज असतेच...ग्रामिण भागात वर्षातून भरणार्या यात्रा जत्रा त्या निमीत्ताने भेटणारी ही मनोरंजनात्मक माणसं....कुंटुबाला एकत्र ठेवत होती.
आज प्रचंड मनोरंजनाचा काळ आला आहे पण हे कोरडे मनोरंजन मनाचा हळवा कोपरा भरुन काढण्यासाठी अपुरा पडत आहे.
व्हाँटसअँपवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ दुसऱ्यांना  शिकवणारे,सल्ले देणारे, मेसेज आदळत राहतात.
घाणेरडे चित्रपट गर्दी करतात. टि.व्ही वरील मालीका कुटुंब व्यवस्थाच नष्ट करतात. नव्या नव्या मोबाईल गेम्स मुलांना वेडे करतात....त्यांना जीव द्यायला भाग पाडत आहेत.
मनोरंजनाचा भस्म्या रोग माणसाला झाला आहे. त्याला आता कुटुंबात बोलायला वेळ नाही पण रांत्रदिवस मोबाईलवर चँटीग करायला वेळ आहे.
संवाद ज्या वेळी ज्या दिवशी संपतो त्यावेळी माणसातील समज गैरसमजाचे पिक जोमाने वाढते.
मनोरंजनाचा अतिरेक होतो त्यावेळी विवेकी विचारांचा अंत होतो....!
जग बदलत असताना आपण त्या जगाच्या वाटा बदलू शकत नाही ...आपणही त्या वाटेवरीलच वाटसरु आहोत पण आपण आपुलकीचा जिव्हाळा संवाद जपलाच पाहिजे.
 मला कधी कधी उगाच वाटते ते गावात येणारे रामलिलावाले,नंदीबैलवाले,मरीआईवाले,डोंबारी हे सगळे आता कुठे असतील ? आता हे  कधीच गावात दिसणार नाहीत पण स्वप्नात तरी येतील ना...!
 ज्या ग्रामिण मनोरंजनाचे हे  कलाकार आधार होते ते आज कुठे गायब झाले.
मुंबईत राहत आसताना मोठ्या  पुलाखाली राहत असलेल्या लोकांचे मला नेहमीच अप्रुप वाटते  ज्या गावांनी  लोककलांवतांच्या कित्येक पिढ्या जगवल्या त्यांचे वारसदार या शहरातील पुलाखाली तर नसतील ना...!

- *बिपीन जगताप*
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.