Type Here to Get Search Results !

नव्या वर्षाचे नवे स्वागत


नव्या वर्षात....!

नव्या वर्षात नव घडो...पण जुन्यांची संगत न सुटो...!
माणसाला भुतकाळात रमायला तरी आवडते अथवा भविष्यातील स्वप्नात गरुड भरारी मारायला तरी आवडते. माणूस सहजा सहजी वर्तमानात जगायला तयारच नसतो. भारतीय अध्यात्म  माणसाला वर्तमानात जगायला शिकवते. सध्याचा काळ हाच सर्वांग सुंदर आहे आणि त्या काळाचा मनमुराद आनंद लुटायला माणसाने नेहमीच तयार असले पाहीजे.
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे संतानी सांगीतले आहे. मन हेच सर्व गोष्टींसाठी जबाबदार असते. मन सतत सैराभैर फिरत असते. धावणार मन काबूत ठेवून त्याला वर्तमनात जगायला लावणे हे सर्वारथाने कठीण वाटत असले तरी ते अशक्य मात्र नाही.
लहान बालक अगदी सहज जीवन जगते. प्रचंड उत्साह,आनंद,खेळकर वृत्ती, निरागस हास्य,मनमोळके रडणे, सगळेच अचंबीत करणारे पण तरीही लोभस...!
या लोभस जीवनाचे रहस्य केवळ ते वर्तमनात जगते हेच आहे. माणसाच्या जीवनातील हा बाल्य काळ कायम राहीला तर ...तर माणूस आनंदी जीवन जगू शकतो. तो काळाला जिंकू शकतो.
दिवसा मागून दिवस जातात....वर्षा मागून वर्ष आणि अशीच जीवनाची संध्याकाळ जवळ येते. थोड्याच वेळाने पुन्हा एक नवीन वर्ष येईल...बघता बघता पुन्हा सरुन जाईल..तीच काळजी तीच चिंता माणसाला सतावत मात्र राहील.
आजच्या धकाधकीच्या काळात आपण सहज जीवन जगणंच विसरुन गेलोय. आपल्याला सहजीवनही जगता येत नाही आणि सहज जीवनही ही खरी शोकांतीका आहे.
अवर्णनीय सुंगध मृगाला वेडे करतो मग हा मृग कस्तुरी शोधण्यासाठी संगळ जंगल फिरतो आणि दमुन भागून बसल्यावर त्याला  आपल्याच  बेंबीत असणारी कस्तुरी दिसते अगदी तशी अवस्था आपली झाली आहे. आपण आनंदासाठी सगळं जग फिरतो मात्र आनंद आपल्या अतंरातच आहे हेच आपण विसरुन गेलो आहोत. या न संपणार्या आनंदाचा शोध घेणे आणि तो निरागस आनंद घेत जीवन जगणे हेच तर सर्व धर्माचे मुळ आहे.
काल काय झाल याची फार आठवण न काढता उद्या काय होईल याची जराशीही चिंता न करता आताचा वर्तमान मी जगेन माझ्या वाट्याला येणारा प्रत्येक क्षण जगेन असे ठरवून नवीन वर्षात पदार्पण केले तर माणसाचे जीवन सुखमय होईल.
हे जीवन सुंदर आहे....हे वाक्य न चूकता म्हणत चला...जीवनरुपी डोंगर चढताना अनेकदा वाटेत काटे येतीलही....अनेकदा धाप लागणारी पायवाटही लागेल मात्र ध्येय ठेवा आणि श्वास ठेवा मग बघा आनंदाची एक लहर मनाला आणि शरीराला सुख देईल.
नवीन वर्ष आले की आपण लगेच म्हणतो मागचं वर्ष छान होत...आणि नव्या वर्षाचे स्वागत करतो पण मागचं तर छान होतच आणि नव येणारही छानच असेल असे म्हणत नव्या उमेदीन एक पाऊल पुढे टाकावे.
येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा  आनंदाने स्विकार करावा. सगळेच दिवस सारखे नसतात प्रत्येक दिवस एक नवी गोष्ट घेऊन येतो. प्रत्येक क्षण जगण्याची प्रेरणा देतो.
सूर्य तोच आहे... त्याचा मावळतीला जाणारा प्रकाशही तोच आहे. मात्र उद्याचा सुर्य वेगळा असेल तो माझ्यासाठी उगवेल. नव्या उत्साहाला उधान आणत तो नवा प्रकाश देईल. सर्वांच्या घरातील अंधकार दुर करीत माणसाला माणसाजवळ घेऊन जाईल.
चैतन्य हे या विश्वात आहेच त्या चैतन्याचा शोध लागावा आणि ते आपल्या मनात हृदयातून ओसांडून वाहवे.
जे रंजले गांजले त्यांच्या पर्यंत पोहचावे ...माणसाबरोबर माणसासम वागावे....आणि नव्या  उत्साहाच उधान कायम रहावे याच नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...!

- बिपीन जगताप
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.