Type Here to Get Search Results !

बबन मराठी चित्रपट


'बबन'....गावातल्या तरुणांचे दाहक चित्रण...!

शहराकडे येणारे लोंढे थांबावेत आणि गावातच उद्योग व्यवसाय करुन तरुणांनी स्वावलंबी व्हावे हे सांगणे जेवढे सहज सोपे असते तेवढेच ते कठीणही असते कुंटुंबच नाही तर समाजही त्याला अनेकदा साथ देत नाही. सध्या गाजत असलेला 'बबन'हा चित्रपट गावातील होतकरु तरुणांचा संघर्ष  दाखवतो.
दोन भाऊरावांचा हा अस्सल ग्रामिण भाषेतला चित्रपट प्रत्येक संवेदनशिल माणसाला अंतर्मुख करायला लावणारा आहे.
'बबन' नावाचा होतकरु तरुण समाजातील लाखो तरुणांचे प्रतिनिधित्व करतो.
मागील काही वर्षात गावांची व्याख्या बदलली आहे. शहर आणि गाव यातील रेषा हळूहळू धूसर होत चालली आहे.
 गावालगत आलेल्या एम.आय.डि.सी, त्यात शेतीचा गुंठा करुन विकून आलेली श्रीमंती, राजकारणातील गटतट, खोट्या प्रतिष्ठेपायी सुरु झालेली स्पर्धा, मोबाईलचा वापर करीत आभासी जगात स्टेटस निर्माण करण्याचा गावगुंडाचा प्रयत्न समाजमन गढूळ करीत गावांना संपवत आहे.
 श्रीमंत आणि गरीब हा संघर्ष पुन्हा पुन्हा उफाळून येत आहे.
हे माझ गाव आहे, या गावात मी ठरवेन तेच झाले पाहीजे, शेतीचे गुंठे विकून सुरु झालेली ही घाणेरडी सत्ता स्पर्धा आज गावागावातील तरुणांना संपवत आहे. त्यांच्यातील उत्साह आणि नव्याने उभे राहण्याचे स्वप्न हे लोक बेचीराख करीत आहेत.
नव्या जोमाने  हिंमतीने उभा राहणारा बबन या नवतरुणाला गावातील गुंठा विकून आणि एम.आय.डि.सी तील कंत्राट घेऊन राजकारण करणारी पिसाळलेली माणसं संपवतात. अशा पद्धतीने तरुणांची स्वप्न संपवली जातात त्यावेळी मग समाजात विद्रोह निर्माण होतो.
ग्रामिण भागात सुरु असलेला संघर्ष आता तिव्र होत चाललेला आहे.
 जगण्याचा संघर्ष तिव्र होत असताना गावपातळीवर तरुणांचा  राजकारणासाठी होणारा वापर  आणि गटातटाची लढाई तरुणांची डोकी भडकवत आहेत.
'बबन' चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक भाऊराव कर्हाडे यांनी मांडलेली ही गावातील वस्तुस्थिती मनाला वेदना देऊन जाते.
चित्रपट हे माध्यम अनेकदा मनोरंजन करते आणि  मनोरंजनातून प्रबोधनही करते मात्र भाऊराव यांचा हा चित्रपट वस्तुस्थिती दाखवतो आणि गावातील दाहकताही टिपतो. कोणतेही माध्यम हे समाजमनाचा आरसा असते या आरशात सध्या सुरु असलेला संघर्ष दाखवण्याचे मोठे धाडस भाऊरावांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले आहे.
भाऊसाहेब शिंदे यांनी केलेला सहज सुंदर अभिनय शेवटपर्यंत 'बबन' ला न्याय देणारा आहे. खलनायक आणि 'बबन'चे आई वडील,आजी सगळ्यांनीच अभिनयातील सर्वोत्तम ऊंची गाठली आहे.
प्रत्येक गावातील 'बबन'ला जगाच्या पातळीवर जायाचे आहे. त्याच्याकडे नवे काम करण्याची धमक आहे त्याला मदतीची नाही पण प्रोत्साहनाची गरज आहे.... नवे जग जिंकायला निघालेल्या तरुणांना ही लढाई लढावीच लागेल..!
नक्की बघा 'बबन'

- बिपीन जगताप
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.