Type Here to Get Search Results !

तूफान आलया ...!


एकजूटीनं पेटलं रान .....तुफान आलया....!

माण तालुक्यातील कुकडवाड या गावात आज मी याची देही याची डोळा पाण्यासाठी माणसांच्या एकजूटीचे तुफान  पाहीले....लोकांच्यातील उत्साहाचा महापूर पाहीला....आणि  सर्व भेदांच्या पलिकडचे 'जीवन' काय असते याची अनूभुतीही घेतली. डोंगराला भिडणारी माणस दुष्काळाला हरवायला निघाली आहेत.
'माझ्या गावाला यंदा मी पाण्याने समृद्ध करणार आहेच' या जिद्दीने पेटलेला कुकडवाडचा ग्रामस्थ दररोज श्रमदान करीत आहे. पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत सहभागी झालेले हे गाव पाणीदार होण्याच्या सर्व कसोट्या पूर्ण करीत आहे . गावाला चारी बाजूने डोंगराचा वेढा पडलेला आहे यंदा हा डोंगर हिरवागार होणार आहे लाखो लीटर पाणी वाचवण्याचा हा प्रयोग यशस्वी होणार आहे असा विश्वास मला या गावातल्य जेष्ठांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर दिसत होता.
गावाला पाणिदार करण्यासाठी कंबर कसलेले लहान थोर जोमाने कामाला लागले आहेत.
यंदा कुकडवाडच्या या कष्टाला  आजूबाजूच्या डोंगरांनी पाहीले आहे त्यामुळे चुकार काळ्या ढगाला यावर्षी सहजासहजी पुढे जाता येणार नाही धरणीमातेची ओटी भरण्यासाठी त्याला पडावे लागेल आपल्या झोळीतील पाणी सांडावें लागेल.
पावसाची चातकासारखी वाट बघणारी पाखरं आणि पोरं आज हरखलेली दिसत होती. गेली दोन महिने घाम गाळणारी माणंस आभाळाला जिंकायला निघाले आहेत. रात्रंदिवस गाव पाणीमय करण्याचे स्वप्न पाहणारी तरणी पोर कष्टाला कमी पडली नाहीत. स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, जाती धर्म, असे सगळे भेद विसरुन माणसं जगण्याची मजा कशी  घेतात याचा अनुभव कुकडवाड ग्रामस्थ दाखवून देत आहेत.
पाणी हे जीवन आहे, पाणी ज्यावेळी एका जागेवर थांबते त्यावेळी  त्याचे डबके होते मात्र ते वाहते राहिले तरच ते खळ खळ वाहणारा झरा ठरते माणसांनाही संकुचित विचारसरणीच्या डबक्यातून बाहेर पडत गावच्या विकासाचा झरा बनता आले पाहिजे . मनाच्या तळाशी असलेला असूया द्वेष हा गाळ काढून देहाची ही घागर अमृताने भरली तर सारी सृष्टी प्रेमाने आकृष्ट होईल.
अशाच प्रेमाने ओथंबलेली लोक आजही दिसून येतात .
याच गावचे सुपुत्र मंत्रालयातील उद्योग विभागाचे उपसचिव डाँ.नामदेव भोसले यांनी श्रमदानाचा नवा आदर्श घालून दिला आहे. या समृद्धशाली स्वप्नाचा भाग होण्याची संधी  त्यांनी सर्व मित्रपरिवाराला दिली आहे. कृषी विभागाचे कक्ष अधिकारी अजित काटकर आणि कृषी सहाय्यक श्री वाघमारे यांनी गावाच्या या विकासात बावीस दिवस कार्यालयीन रजा घेऊन पुर्ण वेळ श्रमदानाला दिला आहे.
गावातलीच नाही तर मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी, सिनेतारका प्राजक्ता माळी, राष्ट्रीय स्तरावरील धावपट्टू , माँडेल, खेळाडू, असे शेकडो लोक या श्रमदानात सहभागी होत आहेत.
पाणी म्हणजेच जीवन आणि याच पाण्यावरुन जगातले तिसरे महायुद्ध होईल असे भाकित अनेकदा केले जाते पण पाणी माणसांना एकत्र आणते माणसांना  समृद्ध करते,प्रेम आणि जिव्हाळा शिकवते हे मला कुकडवाड ग्रामस्थांनी शिकवले हे मात्र नक्की ....!
या श्रमदानात मला ही सहभागी होता आले याचाही आनंद आहे.

- बिपीन जगताप
www.bipinjagtap.blogspot.com

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.