'कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय'..!
"बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी मी गावोगावी संस्था उभ्या करीन"...असे ब्रिद वाक्य घेऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती...त्यांच्याच संस्थेत आमचे शिक्षण झाले.....याचा अभिमान आजही वाटतो.
'कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय' सांगवी.
अशा भारदस्त नावाच्या शाळेत आमचं माध्यमिक शिक्षण पुर्ण झाले. भली मोठी तीन मजली बिल्डींग मध्ये असलेली ही शाळा भव्य दिसायची. गावातल्या साध्या कौलाच्या शाळेतून डायरेक्ट एवढ्या मोठ्या शाळेत जाणं म्हणजे आमच्यासाठी फार मोठी मजल होती. आम्ही कांबळेश्वरच्या सातवीतील जवळपास दहा पंधरा जणांनी सांगवीच्या शाळेत आठवीत प्रवेश घेतला. या भव्य दिव्य शाळेची लायब्ररी, तिसऱ्या मजल्यावरील प्रयोगशाळा सगळंच कसं देखण होत. प्राचार्यांच्या कार्यालयाबाहेर असणारे अब्राहम लिंकनचे पत्र नेहमी वाचायला आवडायचे.
शाळा सुरु झाली अनं नव्या शाळेत सगळेच नवे होते. आजूबाजूच्या चार पाच गावातील मुल मुली या शाळेत येत. गोणपाटावरुन थेट बेंचवर घेऊन जाणारा हा प्रवास खुपच उत्साहाचा होता..आनंदाचा होता... पण मोठ्या इमारतीत जाण्याचे आमचे स्वप्न भंगले आणि आम्हाला थेट शाळेच्या बाजारतळाकडील पत्र्यांच्या खोलीत जागा मिळाली. आठवी अ,ब,हे मुलींचे वर्ग मुख्य इमारतीत तर क,ड.इ, या तुकड्या शाळेपासून लांब...अगदी नदीच्या कडेला..बाजारतळावर .. पण शिक्षणाने झपाटलेले मावळे त्या ही वर्गात आनंदाने गेले.
सात दिवसातील शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार आमच्या आनंदाचा दिवस ..शाळेच्या पुढ्यात भरणारा हा बाजार...भज्यांचा घमघमाट, केरसुण्यांचा ओला वास, हिरवागार भाजीपाला,ओली भेळ...संगळ कसं भारावून टाकणारं होत.
गावाकडंन बाजाराला आलेल्या लोकांना खिडकीत बसून बघायची मजा वेगळीच,...!
इंग्रजी शिकवणारे बनसोडे सर आणि मराठी शिकवणारे नलवडे सर दोघांची प्रचंड दहशत आणि त्यामुळे भिती वाटायची.बनसोडे सरांच्या आवाजातला दरारा आजही मला हादरवतो.
मराठी शिकवायला येणाऱ्या बनसोडे मँडम छान शिकवायच्या, शांत गंभीर असणारे गणिताचे कदम सर फारच वेगळे वाटायचे...अनेक शिक्षक मनापासून ज्ञानदान करायचे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची ही संस्था आम्हाला जीवन शिक्षण देऊन गेली.
प्रयोगशाळा,खेळाचे मैदान आम्हा मुलांना मोकळी होती. ग्रंथालयातून मिळणारी पुस्तके आठवडाभर वाचायचो.
आजच्या सारखी आमची पिढी 'फाँरवर्ड'नव्हती पण समजदार होती. शाळेविषयी गंभीर होती. शिक्षकांचा आदर करणारी होती.
दुरदर्शनवरील मोघली महाभारत,रामायण बघणारी आमची पिढी मैदानावर खेळायची, सणासुदीच्या काळात उत्साहात असायची.
शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसायची....
आज जग खुप बदललेय .टेक्नाँँलाँजीत पुढे गेलेय..पण हे जूने दिवस परत अनुभवण्याची क्षमता या तंत्रज्ञानात नाही.
सगळ्यांनाच शाळेची ही वर्ष हुरहुर लावतात. आठवणी घायाळ करतात....पुन्हा पुन्हा आठवत राहतात.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...!
- बिपीन जगताप